05 – स्वर्ग

हे सर्वशक्तिमान देवाचे पवित्र शब्द आहेत.
माणसांच्या बोलण्यात आपल्याला रस नसतो.
देवावर प्रेम करणार् या प्रत्येकासाठी... याबद्दल देव असे म्हणतो: स्वर्ग.

शीर्ष 3 सर्वात महत्वाचे श्लोक

परंतु ज्याप्रमाणे पवित्र शास्त्र म्हणते, “डोळ्यांनी पाहिले नाही, कानांनी ऐकले नाही आणि मनुष्याच्या मनात जे आले नाही, ते देवाने त्याच्यावर प्रीती करणाऱ्यांसाठी तयार केले आहे.”

‘त्या नगरात यापुढे कसलाही शाप असणार नाही;’ त्याच्यामध्ये देवाचे व त्याच्या कोकऱ्याचे राजासन राहिल. त्याचे दास त्याची सेवा करतील. आणि ‘ते त्याचे मुख पाहतील’ व त्यांच्या कपाळावर देवाचे नाव लिहिलेले असेल. त्या नगरात यापुढे कधीही रात्र होणार नाही. लोकांस प्रकाश मिळविण्यासठी ह्यापुढे कुठल्याही दिव्याची अथवा सूर्याची गरज पडणार नाही; कारण ‘प्रभू देव’ आपला ‘प्रकाश त्यांच्यावर पाडील; आणि ते युगानुयुग राज्य करतील.’

पृथ्वीवरील खूप मृत व पुरलेले उठतील. काहींना चिरंजीवित्व लाभेल पण काहींना कायमची अप्रतिष्ठा व तिरस्कार लाभेल. ज्ञानी आकाशाप्रमाणे तेजाने चमकून उठतील ज्या ज्ञानी लोकांनी इतरांना योग्य जीवनमार्ग शिकविला, ते सदासर्वकाळ ताऱ्यांप्रमाणे चमकतील.

कॅनोनिकल क्रमातील प्रत्येक श्लोक - 183 परिच्छेद

देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली.

परमेश्वर देवाने सुदंर दिसणारी अन्नासाठी उत्तम अशी सर्व जातीची झाडे बागेमध्ये उगवली आणि बागेच्या मध्यभागी जीवनाचे झाड आणि बऱ्यावाईटाचे ज्ञान देणारे झाड अशी झाडे लावली.

तेव्हा त्याला एक स्वप्न पडले; स्वप्नात एक उंच शिडी आहे, तिचे एक टोक जमिनीवर व दुसरे टोक वर स्वर्गापर्यंत पाहोचलेले आहे असे त्याने पाहिले;

याकोबाला भीती वाटली, तो म्हणाला, “हे फार महान ठिकाण आहे, हे देवाचे निवासस्थान, त्याचे घर व स्वर्गाचे दार आहे.”

“सर्वकाही तुमचा देव परमेश्वर ह्याचे आहे. आकाश, आकाशापलीकडचे आकाश, पृथ्वी व पृथ्वीवरचे सर्व काही परमेश्वर देवाचे आहे.

आता तू तुझ्या पवित्र निवासस्थानातून, स्वर्गातून आम्हा इस्राएल लोकांना आशीर्वाद दे. आम्हाला दिलेल्या भूमिला आशीर्वाद दे. ही दुधामधाची रेलचेल असलेली भूमी आम्हाला द्यायचे तू आमच्या पूर्वजांना कबूल केले होतेस.

“पण परमेश्वरा, तू खरोखरच इथे पृथ्वीवर आमच्यामध्ये कायम राहाशील का? हे विस्तीर्ण आकाश आणि स्वर्ग यांतही तू मावत नाहीस. तेव्हा हे मी बांधलेले मंदिरही तुझ्यासाठी अपुरेच आहे.

परमेश्वरा, इस्राएलचे सर्व लोक आणि मी इथे येऊन तुझी प्रार्थना करु तेव्हा त्या प्रार्थना ऐक. तुझे वास्तव्य स्वर्गात असते हे आम्हाला माहीत आहे. तेथे त्या तुझ्या कानावर पडो आणि तू आम्हाला क्षमा कर.

महिमा, पराक्रम, शोभा, विजय आणि सन्मान ही सर्व तुझीच आहेत कारण स्वर्ग - पृथ्वीवर जे जे काही आहे ते तुझेच आहे. परमेश्वरा, हे राज्य तुझेच आहे. या सागळ्यांचा शास्ता आणि मुकुटमणी तूच आहेस.

तू देव आहेस, परमेश्वरा, तूच फक्त देव आहेस. आकाश तू निर्माण केलेस. स्वर्ग आणि त्यातील सगळे काही तू केलेस. ही पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही तू निर्माण केलेले आहेस. सर्व समुद्र आणि त्यांच्यातील सगळयाचा तूच निर्माता आहेस! तू सगळयात जीव ओतलेस. स्वर्गातील देवदूत तुला वाकून अभिवादन करतात व तुझी उपासना करतात.

परमेश्वर त्याच्या पवित्र राजप्रासादात राहतो. तो स्वर्गात त्याच्या सिंहासनावर बसतो आणि जे काही घडते ते तो बघतो परमेश्वर त्याच्या डोळ्यांनी लोकांकडे अगदी बारकाईने पाहातो ते चांगले आहेत की वाईट आहेत ते तो बघत असतो.

तू मला नीट कसे जगावे ते शिकवशील परमेश्वरा, केवळ तुझ्या सान्निध्यात असणेही संपूर्ण समाधान देणारे असेल. तुझ्या उजव्या बाजूला राहण्याने कायमचे समाधान लाभेल.

परमेश्वर त्याने निवडलेल्या राजाला मदत करतो हे आता मला कळले. देव त्याच्या पवित्र स्वर्गात होता आणि त्याने स्वत च निवडलेल्या राजाला उत्तर दिले. देवाने आपल्या महान सामर्थ्याचा राजाला वाचवण्यासाठी उपयोग केला.

त्याने तुझ्याकडे जीवनाची मागणी केली आणि तू ते त्याला दिलेस, देवा, तू राजाला कधीही न संपणारे चिरंजीव आयुष्य दिलेस.

पैसा कुणाकडेच नसतो व शरीर थडग्यात कुजू नये म्हणून ते वाचविण्यासाठी ही कुणाकडे पैसे नसतात.

परमेश्वर पवित्र सियोन पर्वतावर येतो. त्याच्या मागे त्याचे लाखो रथ असतात.

त्याचा वंश सदैव चालू राहील. स्वर्ग असेपर्यंत त्याचे राज्य असेल.

देवाचे त्याच्या भक्तांबद्दलचे प्रेम हे स्वर्ग पृथ्वीव रजितक्या उंचीवर आहे तितके आमच्यावर आहे.

देवाचे सिंहासन स्वर्गात आहे आणि तो सर्वांवर राज्य करतो.

हर्मोन पर्वतावरुन सियोनवर पडणाऱ्या हळूवार पावसासारखे वाटते.सियोन पर्वतावरच परमेश्वराने त्याचे आशीर्वाद, त्याचे शाश्वत जीवनाचे आशीर्वाद दिले.

जर तुम्ही योग्य रीतीने जगलात तर तुम्हाला खरे जीवन मिळेल. सदैव जगण्याचा तोच मार्ग आहे.

देवाने आपल्याला या जगाबद्दलविचार करण्याची शक्ती दिली. पण देव जे काही करतो ते आपण पूर्णपणे कधीही समजून घेऊ शकणार नाही. आणि तरीही देव सारे काही अगदी योग्य वेळी करीत असतो.

उज्जीया राजाच्या मृत्यूच्या वर्षीच मी माझ्या प्रभूला पाहिले. तो एका उच्च व विलक्षण सुंदर सिंहासनावर बसला होता. त्याच्या पायघोळ पोशाखाने सर्व मंदिर भरून गेले होते. देवदूत परमेश्वराभोवती उभे होते. प्रत्येक देवदूताला सहा पंख होते. त्यातील दोन पंखांनी ते चेहरा झाकीत. दोनने पाय झाकीत व उरलेल्या दोन पंखांनी उडत. ते देवदूत एकमेकांशी बोलत होते. ते म्हणत होते, “पवित्र, पवित्र, पवित्र सर्वशक्तिमान परमेश्वर परमपवित्र आहे. त्याची प्रभा सगळ्या पृथ्वीला व्यापून राहिली आहे.” देवदूतांचे आवाज फार मोठे होते.

त्याच्या राज्यात सामर्थ्य आणि शांती नांदेल. आणि दाविदच्या वंशाच्या ह्या राजाच्या काळात ती वाढतच जाईल. हा राजा सदासर्वकाळ सदाचार आणि प्रामाणिक न्यायबुध्दीने राज्य करील.सर्वशक्तिमान परमेश्वराला त्याच्या लोकांबद्दल अतिशय प्रेम आहे. ह्या प्रेमापोटीच ह्या सर्व गोष्टी घडून येतील.

त्या वेळेला लांडगे मेंढरांबरोबर सुखशांतीने राहतील, वाघ कोकरांबरोबर शांतपणे झोपेल. वासरे, सिंह, आणि बैल शांततेने एकत्र राहतील आणि एक लहान मुलगा त्यांना वळवील.

पण मृत्यूवर पूर्णपणे मात करता येईल आणि परमेश्वर माझा प्रभू, प्रत्येक चेहऱ्यावरचा, प्रत्येक अश्रू पुसून टाकील. पूर्वी त्याच्या लोकांनी दु:ख भोगले पण देव पृथ्वीवरचे दु:ख दूर करील. परमेश्वराने सांगितले असल्यामुळेच हे सर्व घडून येईल.

देव अती उच्च व परम थोर आहे. देव चिरंजीव आहे. त्याचे नाव पवित्र आहे. देव म्हणतो, मी उंच आणि पवित्र जागी राहतो हे खरे पण मी दु:खी आणि लीन यांच्याबरोबरही असतो. मनाने नम्र असलेल्यांना आणि दु:खी लोकांना मी नवजीवन देईन.

“या पुढे तुला रात्रंदिवस चंद्र सूर्य नव्हे तर परमेश्वर प्रकाश देईल. परमेश्वर तुझा चिरकालाचा प्रकाश होईल. तुझा देवच तुझे वैभव असेल. “तुझा ‘सूर्य’ कधी मावळणार नाही आणि ‘चंद्राचा’ क्षय होणार नाही. कारण परमेश्वर तुझा अक्षय प्रकाश असेल. तुझा दु:खाचा काळ संपेल. “तुझे सर्व लोक सज्जन असतील. त्यांना कायमची भूमी मिळेल. मी त्या लोकांना निर्माण केले. मी माझ्या स्वत:च्या हातांनी तयार केलेली ती सुंदर रोपटी आहेत.

“मी नवा स्वर्ग आणि नवी पृथ्वी निर्माण करीन. लोक भूतकाळाची आठवण ठेवणार नाहीत. त्यांना त्यातील एकही गोष्ट आठवणार नाही.

देव असे म्हणाला, “आकाश माझे सिंहासन आहे आणि पृथ्वी हे माझे पाय ठेवण्याचे आसन आहे. मग तुम्ही माझ्यासाठी घर बांधू शकाल असे तुम्हाला वाटते का? नाही. तुम्हाला ते शक्य नाही. तुम्ही मला विश्रांतीसाठी जागा देऊ शकाल का? नाही. तुम्ही जागा देऊ शकणार नाही.

“मी नवे जग निर्माण करीन आणि नवा स्वर्ग व नवी पृथ्वी अक्षय राहतील. त्याचप्रमाणे तुमची नावे आणि मुले नेहमी माझ्याबरोबर असतील.

परमेश्वरा म्हणतो, “मी इस्राएलच्या वंशजांना कधीही नाकारणार नाही. लोक जर आकाशाचे मोजमाप करु शकले किवा पृथ्वीच्या पोटातील सर्व रहस्ये जाणू शकले, तरच हे घडणे शक्य आहे. तरच मी इस्राएलच्या वंशजाना नाकारीन. त्यानी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल मगच मी त्यांना दूर करीन.” हा परमेश्वराचा संदेश आहे.

त्या वाडग्यावर काहीतरी होते. ते सिंहासनाप्रमाणे दिसत होते. ते इंद्रनीलाप्रमाणे गर्द निळे होते. त्यावर माणसाप्रमाणे दिसणारी आकृती बसलेली होती. मी त्याचा कमरेवरचा भाग पाहिला. तो तप्त धातू प्रमाणे दिसत होता. त्याच्या भोवती आगीचा लोळ असल्याप्रमाणे दिसत होते. मी त्याच्या कमरेखालच्या भागाकडे पाहिले. तो आगीप्रमाणे दिसत होता. त्याच्या सभोवती प्रभा फाकली होती. त्याच्या भोवती फाकलेले तेज इंद्रधनुष्याप्रमाणे होते. ते परमेश्वराच्या वैभवाच्या तेजाप्रमाणे दिसत होते. म्हणून मी ते पाहाताच जमिनीवर पालथे पडून, मस्तक टेकवून वंदन केले. त्या नंतर, माझ्याशी कोणीतरी बोलत असल्याचे मला ऐकू आले.

नदीच्या दोन्ही काठावर सर्व प्रकाराची फळझाडे वाढतात. त्यांची पाने कधीच सुकून गळत नाहीत. त्या झाडांवर नेहमीच फळे असतात. दर महिन्याला झाडांना बहर येतो का? कारण झाडांना मंदिरातून येणारे पाणी मिळते. झाडांची फळे खाण्यासाठी उपयोगी पडतील व पाने औषधी असतील.” "

चौथ्या राजाच्या कारकिर्दीत, स्वर्गातला देव आणखी एक राज्य निर्माण करील. ते कायमचे राहील. त्याचा कधीही नाश होणार नाही. ते दुसऱ्या घराण्याकडे सोपविता येणार नाही. हे राज्य इतर राज्यांना चिरडून टाकील, त्यांचा शेवट करील पण ते राज्य सदासर्वकाळ टिकून राहील.

माझ्या रात्रीच्या दृष्टान्तात मला मनुष्यप्राण्याच्या आकृतीसारखे काहीतरी दिसले. तो ढगांवरून येत होता. तो प्राचीन राजाकडे आला. त्याला राजासमोर आणण्यात आले. “मग त्या मनुष्यप्राण्याप्रमाणे दिसणाऱ्याला अधिकार, वैभव व संपूर्ण सत्ता देण्यात आली सर्व लोक राष्ट्रे व निरनिराळे भाषा बोलणारे सर्व त्याची सेवा करणार होते. त्याची सत्ता चिरंतन होती. त्याचे राज्य कायमचे होते. त्याचा कधीही नाश होणार नव्हता.

ती पृथ्वीतून उदयास येतील पण देवाच्या खास लोकांनाच राज्य मिळेल आणि ते सदासर्वकाळ राहील.’

मग देवाचे खास लोक राज्य करतील. ते पृथ्वीवरच्या सर्व राज्यांतील सर्व लोकांवर राज्य करतील. हे राज्य कायम राहील. व इतर राज्यातील लोक त्याला मान देतील, त्याची सेवा करतील.”

पृथ्वीवरील खूप मृत व पुरलेले उठतील. काहींना चिरंजीवित्व लाभेल पण काहींना कायमची अप्रतिष्ठा व तिरस्कार लाभेल. ज्ञानी आकाशाप्रमाणे तेजाने चमकून उठतील ज्या ज्ञानी लोकांनी इतरांना योग्य जीवनमार्ग शिकविला, ते सदासर्वकाळ ताऱ्यांप्रमाणे चमकतील.

“पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.”

त्याच्या हातात त्याचे सूप आहे, तो आपले खळे अगदी स्वच्छ करील व आपले गहू कोठारात साठवील; पण भूस न विझणाऱ्या अग्नीने जाळून टाकील.”

तेव्हापासून येशूने उपदेश करणे सुरु केले व तो म्हणू लागला की; “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य तुमच्या जवळ आले आहे.”

“जे आत्म्याने ‘दीन’ ते धन्य आहेत, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.

न्यायीपणाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य आहेत, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जेव्हा लोक माझ्यामुळे तुमचा अपमान करतात व छळ करतात आणि तुमच्याविरुध्द सर्वप्रकारचे वाईट लबाडीने बोलतात तेव्हा तुम्ही धन्य आहात. आनंद व उल्लास करा, कारण तुम्हास स्वर्गात मोठे प्रतिफळ आहे कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचाही लोकांनी अशाचप्रकारे छळ केला.

यास्तव जो कोणी या लहान आज्ञातील एखादी आज्ञा रद्द करील व त्याप्रमाणे लोकांस शिकवील त्यास स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील; पण जो कोणी त्या पाळील व शिकवील त्यास स्वर्गाच्या राज्यात महान म्हणतील. म्हणून मी तुम्हास सांगतो, शास्त्री व परूशी यांच्या न्यायीपणापेक्षा तुमचे न्यायीपण अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यांत तुमचा प्रवेश होणारच नाही.

म्हणून तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही अशाप्रकारे प्रार्थना करावीः हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.

आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास त्या दुष्टापासून सोडव. (कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरवही सर्वकाळ तुझीच आहेत.)

तुम्ही पृथ्वीवर स्वतःसाठी संपत्ती साठवू नका कारण येथे कसर व जंग लागून तिचा नाश होईल आणि चोर घर फोडून ती चोरून नेतील. म्हणून त्याऐवजी स्वर्गात आपणासाठी संपत्ती साठवा. जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल.

अरुंद दरवाजाने आत जा कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रूंद व मार्ग प्रशस्त आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ लोक आहेत. पण जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग अडचणीचा आहे आणि ज्यांस तो सापडतो ते फारच थोडके आहेत.

मला प्रभू, प्रभू म्हणणारा प्रत्येकजण स्वर्गाच्या राज्यात जाईलच असे नाही; तर माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे जो वागतो त्याचाच प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल.

तुम्ही जाल तेव्हा संदेश द्या व असे म्हणा, “स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.”

मी तुम्हास खरे सांगतो की, स्त्रीयांपासून जन्मलेल्यांमध्ये बाप्तिस्मा करणारा योहान याच्यापेक्षा मोठा असा कोणी झाला नाही, तरीही स्वर्गाच्या राज्यात जो अगदी लहान आहे तो त्याच्यापेक्षा मोठा आहे.

मग शिष्य जवळ येऊन त्यास म्हणाले, आपण त्याच्याबरोबर दाखल्यानी का बोलता? त्याने त्यास उत्तर दिले, स्वर्गाच्या राज्याची गुपीते जाणण्याचे दान तुम्हास दिले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही.

त्याने त्याच्यापुढे आणखी एक दाखला मांडला की, स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे; तो कोणाएका मनुष्याने घेऊन आपल्या शेतात लावला; तो तर सर्व दाण्यामध्ये लहान आहे; तरी वाढल्यावर भाजीपाल्यापेक्षा मोठा होऊन त्याचे असे झाड होते की, आकाशातील पाखर त्याच्या फांद्यात वस्ती करतात.

तेव्हा नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. ज्याला कान आहेत तो ऐको.

स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या धनासारखे आहे, ती कोणाएका मनुष्यास सापडली आणि त्याने ती लपवून ठेवली. मग आनंदाच्या भरात त्याने जाऊन, आपले सर्वस्व विकले आणि ते शेत विकत घेतले.

आणखी, स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्याचा शोध करणाऱ्या कोणाएका व्यापारासारखे आहे; त्यास एक अति मोलवान् मोती आढळला; मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि ते विकत घेतला.

आणखी, स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेल्या एखाद्या जाळ्यात सर्वप्रकारचे जीव एकत्र सापडतात त्यासारखे आहे; ते भरलेल्या मनुष्यानी ते किनार्‍याकडे ओढले आणि बसून जे चांगले ते भांड्यात जमा केले, वाईट ते फेकून दिले. तसे युगाच्या समाप्तीस होईल; देवदूत येऊन नीतिमानातून दुष्टांना वेगळे करतील.

तेव्हा तो त्यांना म्हणाला, प्रत्येक नियमशास्त्राचा शिक्षक जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे तो आपल्या भांडारातून नव्या जुन्या गोष्टी काढणार्‍या मनुष्यासारखा आहे.

आणि आम्हास आपल्या वस्त्राच्या काठाला स्पर्श करू द्यावा, अशी विनंती केली, तेव्हा जितक्यांनी स्पर्श केला तितके बरे झाले.

मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल.

आणि म्हटले, “मी तुम्हास खरे सांगतो, तुमच्यात बदल होऊन तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही.

सावध असा. ही लहान मुले यांना कमी समजू नका कारण मी तुम्हास सांगतो की, स्वर्गात त्यांचे देवदूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नेहमी पाहतात.

मी तुम्हास खरे सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल. पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले.

परंतु येशू म्हणाला, “लहान मुलांना मजकडे येऊ द्या, त्यांना मना करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.”

नंतर पाहा, कोणीएक मनुष्य येशूकडे आला आणि त्याने विचारले, “गुरूजी सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून मी कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत?” येशूने उत्तर दिले, “काय चांगले आहे असे मला का विचारतोस? फक्त देव एकच चांगला आहे पण जर तुला सार्वकालिक जीवन पाहिजे तर सर्व आज्ञा पाळ.” त्याने विचारले, “कोणत्या आज्ञा?” येशूने उत्तर दिले, “खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको. आपल्या आई-वडीलांना मान दे आणि जशी स्वतःवर प्रीती करतोस तशी इतरावर प्रीती कर.” तो तरुण म्हणाला, “या सर्व आज्ञा मी पाळत आलो आहे. मी आणखी काय करावे?” येशूने उत्तर दिले, “तुला जर परिपूर्ण व्हायचे असेल तर जा आणि तुझे जे काही आहे ते विकून टाक आणि ते पैसे गरीबांना वाटून दे. म्हणजे स्वर्गात तुला मोठी संपत्ती मिळेल आणि चल, माझ्यामागे ये.” पण जेव्हा त्या तरूणाने हे ऐकले, तेव्हा त्यास फार दुःख झाले कारण तो खूप श्रीमंत होता, म्हणून तो येशूला सोडून निघून गेला.

तेव्हा येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, धनवान मनुष्यास स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणे फार कठीण जाईल. मी तुम्हास सांगतो की, धनवानाचा स्वर्गाच्या राज्यांत प्रवेश होणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे जास्त सोपे आहे.”

येशू म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, नव्या युगात जेव्हा मनुष्याचा पुत्र त्याच्या गौरवी राजासनावर बसेल तेव्हा तुम्ही जे सर्व माझ्यामागे आलात ते सर्व बारा राजासनावर बसाल आणि इस्राएलाच्या बारा वंशाचा न्याय कराल. ज्याने ज्याने माझ्यामागे येण्याकरता आपले घर, भाऊ, बहीण, आईवडील, मुले, शेतीवाडी सोडली असेल तर त्यास त्यापेक्षा कितीतरी जास्तपटीने लाभ होईल व त्यास सार्वकालिक जीवन मिळेल.

स्वर्गाचे राज्य एका राजासारखे आहे, त्याने त्याच्या मुलाच्या लग्नानिमित्त भोजनाचे आमंत्रण दिले. त्याने त्याच्या चाकरांना पाठवून, ज्यांना लग्नाचे आमंत्रण होते अशांना बोलाविण्यास सांगितले. पण लोकांनी राजाच्या मेजवानीस येण्यास नकार दिला.

तुम्हास समजले पाहिजे की, पुनरुत्थानानंतरच्या जीवनात लोक लग्न करणार नाहीत किंवा करून देणार नाहीत, उलट ते स्वर्गात देवदूतासारखे असतील. तरी, मरण पावलेल्यांच्या पुनरुत्थानाविषयी देवाने तुम्हास जे सांगितले ते तुम्ही अजूनपर्यंत वाचले नाही काय? ते असे की, मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव आणि याकोबाचा देव आहे, तो मरण पावलेल्यांचा देव नाही तर जिवंताचा देव आहे.

तेव्हा मनुष्याच्या पुत्राच्या येण्याचे चिन्ह आकाशात दिसेल. तेव्हा जगातील सर्व वंश आपले ऊर बडवून घेतील. मनुष्याच्या पुत्राला आकाशांतल्या मेघांवर आरूढ होऊन सामर्थ्याने आणि मोठ्या गौरवाने येताना पाहतील.

आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने कधीही नष्ट होणार नाहीत.

तेव्हा त्यादिवसात स्वर्गाचे राज्य दहा कुमारींसारखे असेल, त्यांनी त्यांचे दिवे घेतले व वराला भेटण्यास गेल्या. त्यांच्यातल्या पाच मूर्ख होत्या आणि पाच शहाण्या होत्या. मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले, पण दिव्यासाठी तेल घेतले नाही. शहाण्या कुमारींनी दिव्याबरोबर आपल्या भांड्यात तेल घेतले.

त्याचा मालक म्हणाला, शाब्बास, चांगल्या आणि विश्वासू दासा, तू भरंवसा ठेवण्यायोग्य चाकर आहेस, तू थोड्या नाण्यांविषयी इमानीपणे वागलास, म्हणून मी पुष्कळावर तुझी नेमणूक करीन. आत जा आणि आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो!

मग राजा जे त्याच्या उजवीकडे आहेत त्यांना म्हणेल, या, जे तुम्ही माझ्या पित्याचे धन्यवादित आहात! हे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्यासाठी तयार केले आहे त्या राज्याचे वतनदार व्हा.

“मग ते अनीतिमान लोक सार्वकालिक शिक्षा भोगण्यास जातील, पण नीतिमान सार्वकालिक जीवन उपभोगण्यास जातील.”

तेव्हा येशू त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर मला सर्व अधिकार देण्यात आला आहे.

येशूने हे पाहिले तेव्हा तो रागवला आणि त्यांना म्हणाला, “लहान बालकांना माझ्याकडे येऊ द्या. त्यांना मना करू नका कारण देवाचे राज्य यांच्यासारख्यांचेच आहे. मी तुम्हास खरे सांगतो, जो कोणी बालकासारखा देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा प्रवेश त्यामध्ये मुळीच होणार नाही.”

येशू प्रवासास निघाला असता एक मनुष्य त्याच्याकडे धावत आला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला, “उत्तम गुरूजी, सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी मी काय करावे?” येशू त्यास म्हणाला, “तू मला उत्तम का म्हणतोस? देवाशिवाय कोणी एक उत्तम नाही. तुला आज्ञा माहीत आहेतच; खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, फसवू नको, आपल्या वडिलांचा व आपल्या आईचा सन्मान कर.” तो मनुष्य म्हणाला, “गुरूजी, मी तरुणपणापासून या आज्ञा पाळत आलो आहे. येशूने त्याच्याकडे पाहिले त्यास त्याच्यावर प्रीती केली तो त्यास म्हणाला, तुझ्यामध्ये एका गोष्टीची उणीव आहे. जा, तुझ्याजवळ जे असेल नसेल ते सर्व विकून आणि गोरगरीबांस देऊन टाक, म्हणजे स्वर्गात तुला संपत्ती प्राप्त होईल आणि मग चल आणि माझ्यामागे ये.” हे शब्द ऐकून तो मनुष्य खूप निराश झाला व खिन्न होऊन निघून गेला कारण त्याच्याजवळ खूप संपत्ती होती.

कारण जेव्हा लोक मरण पावलेल्यातून उठतील तेव्हा ते लग्न करणार नाहीत व करून देणार नाहीत त्याऐवजी ते स्वर्गातील देवदूताप्रमाणे असतील. परंतु मरण पावलेल्यांच्या पुन्हा उठण्याविषयी तुम्ही मोशेच्या पुस्तकातील जळत्या झुडपाविषयी वाचले नाही काय? तेथे देव मोशाला म्हणाला, मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव आणि याकोबाचा देव आहे.

मग येशूने आपल्या शिष्यांकडे पाहिले व म्हणाला, अहो दिनांनो, तुम्ही धन्य आहात कारण देवाचे राज्य तुमचे आहे. अहो जे तुम्ही आता भूकेले आहात, ते तुम्ही धन्य आहात, कारण तुम्ही तृप्त व्हाल. अहो जे तुम्ही आता रडता, ते तुम्ही आशीर्वादित आहात कारण तुम्ही हसाल. जेव्हा मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा व्देष करतील आणि जेव्हा ते आपल्या समाजातून तुम्हास दूर करतील व तुमची निंदा करतील व तुमचे नाव ते वाईट म्हणून टाकून देतील आणि मनुष्याच्या पुत्रामुळे तुम्हास नाकारतील, तेव्हा तुम्ही धन्य आहात. त्यादिवशी आनंद करून उड्या मारा, कारण खरोखर स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे! कारण त्यांच्या पूर्वजांनी संदेष्ट्यांना सुद्धा तसेच केले.

मग तो म्हणाला, देवाच्या राज्याची गुजे जाणण्याची देणगी तुम्हास दिली आहे, परंतु बाकीच्या लोकांस ती दाखल्यांनी सांगितली आहेत, यासाठी की त्यांनी दिसत असता पाहू नये व त्यांनी ऐकत असता समजू नये.

तथापि तुम्हास दुष्ट आत्मे वश होतात याचा आनंद मानू नका तर तुमची नावे स्वर्गात लिहिली आहेत याचा आनंद माना.”

नंतर एक नियमशास्त्राचा शिक्षक उभा राहिला आणि त्याने येशूची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न केला, तो म्हणाला, “गुरुजी, अनंतकाळचे जीवन मिळण्यासाठी मी काय केले पाहीजे?” तेव्हा येशू त्यास म्हणाला, “नियमशास्त्रात काय लिहिले आहे? तू त्यामध्ये काय वाचतोस?” तो म्हणाला, “तू तुझा देव प्रभू याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण आत्म्याने, पूर्ण शक्तिने प्रीती कर.” व स्वतःवर जशी प्रीती करतोस तशी तू आपल्या शेजाऱ्यावरही प्रीती कर. तेव्हा येशू त्यास म्हणाला, “तू बरोबर उत्तर दिलेस, हेच कर म्हणजे तू जगशील.”

त्याऐवजी प्रथम त्याचे राज्य मिळविण्यासाठी झटा म्हणजे या गोष्टीही तुम्हास दिल्या जातील. हे लहान कळपा भिऊ नको, कारण तुम्हास त्याचे राज्य द्यावे यामध्ये स्वर्गीय पित्याला संतोष वाटतो. तुमची मालमत्ता विका आणि गरिबांमध्ये वाटा. जुन्या न होणाऱ्या व न झिजणाऱ्या अशा थैल्या स्वतःसाठी स्वर्गात बनवा. तेथे चोरही जाऊ शकणार नाही व कसरही त्याचा नाश करणार नाही. कारण जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल.

त्याप्रमाणे ज्यांना पश्चात्तापाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतिमानांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी मनुष्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हास सांगतो.

परंतु अब्राहाम म्हणाला, माझ्या मुला, ध्यानात घे की तुझ्या जीवनात जशा तुला चांगल्या गोष्टी मिळाल्या, तशा लाजराला वाईट गोष्टी मिळाल्या. पण आता त्यास आराम मिळत आहे व तू दुःखात आहेस. आणि या सगळ्याशिवाय, तुमच्या व आमच्यामध्ये एक मोठी दरी ठेवलेली आहे, यासाठी की, येथून तुमच्याकडे कोणाला जाता येणार नाही व तुमच्याकडून कोणालाही आमच्याकडे येता येणार नाही.

पण येशू बालकांना स्वतःकडे बोलवून म्हणाला, “बालकांना माझ्याकडे येऊ द्या. त्यांना अडवू नका कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे. मी तुम्हास खरे सांगतो, जो कोणी बालकाप्रमाणे देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही, त्याचा स्वर्गात प्रवेश होऊ शकणार नाही.”

एका यहूदी अधिकाऱ्याने त्यास विचारले, “उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन मिळविण्यासाठी मी काय करू?” येशू त्यास म्हणाला, मला उत्तम का म्हणतोस? देवाशिवाय कोणीही उत्तम नाही. तुला आज्ञा माहीत आहेत ‘व्यभिचार करू नको, खून करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, तुझ्या आई-वडीलांचा मान राख.’ तो अधिकारी म्हणाला, “या सर्व आज्ञा मी माझ्या तरुणपणासून पाळल्या आहेत.” जेव्हा येशूने हे ऐकले, तेव्हा तो त्यास म्हणाला, “तुझ्यामध्ये अजून एका गोष्टीची कमी आहे. तुझ्याजवळचे सर्वकाही विकून ते गरिबांना वाट, म्हणजे स्वर्गात तुला धन मिळेल. मग ये. माझ्यामागे चल.” पण जेव्हा त्या अधिकाऱ्याने हे ऐकले तेव्हा तो फार दुःखी झाला, कारण तो फार श्रीमंत होता. तो दुःखी झाला आहे हे जेव्हा येशूने पाहिले तेव्हा तो लोकांस म्हणाला, “ज्यांच्याजवळ धन आहे, त्या लोकांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती कठीण आहे! होय, श्रीमंत मनुष्याचे देवाच्या राज्यात प्रवेश करणे यापेक्षा उंटाने सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.” नंतर ज्या लोकांनी हे ऐकले, ते म्हणाले, “तर मग कोणाचे तारण होईल?” तो म्हणाला, “ज्या गोष्टी मनुष्यांना अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहेत.”

येशूने त्यांना म्हटले, “मी तुम्हास खरे सांगतो, देवाच्या राज्याकरता ज्याने आपले घर, पत्नी, भाऊ, आई-वडील किंवा मुलेबाळ सोडली त्यांना या काळी पुष्कळ पटीने व येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन मिळणार नाही असा कोणी नाही.”

नंतर तो म्हणाला, “येशू, तू आपल्या राज्यात येशील तेव्हा माझी आठवण कर.” येशू त्यास म्हणाला, “मी तुला खरे सांगतो, आज तू मजबरोबर सुखलोकात असशील.”

आणखी तो त्यास म्हणाला, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, तुम्ही यापुढे आकाश उघडलेले आणि देवदूतांना चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरत असताना पहाल.”

येशू त्यास म्हणाला, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, पुन्हा जन्मल्यावांचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही.” निकदेम त्यास म्हणाला, “म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल? त्यास आपल्या आईच्या उदरात दुसऱ्यांदा जाणे व जन्म घेणे शक्य होईल काय?” येशूने त्यास उत्तर दिले, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यावांचून कोणीही देवाच्या राज्यांत प्रवेश करू शकत नाही. देहापासून जन्मलेले देह आहेत आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहेत.

मी पृथ्वीवरच्या गोष्टी तुम्हास सांगितल्या असता तुम्ही विश्वास ठेवत नाही; मग, मी स्वर्गातील गोष्टी जर तुम्हास सांगितल्या तर तुम्ही कसा विश्वास ठेवाल? स्वर्गातून उतरलेला व स्वर्गात असलेला जो मनुष्याचा पुत्र त्याच्यावाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही. जसा मोशेने अरण्यात पितळेचा सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे, यासाठी की, जो कोणी विश्वास ठेवतो त्यास त्याच्याठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्यास सार्वकालिक जीवन मिळावे.

जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; परंतु जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही, पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो.”

परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्यास कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्यास देईन ते त्यांच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा होईल.”

मी तुम्हास खरे खरे सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही; तो मरणातून जीवनात पार गेला आहे.

त्याचे आश्चर्य करू नका; कारण जेव्हा कबरात असलेले सर्व त्याचा आवाज ऐकतील अशी घटका येत आहे, आणि ज्याने सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील.

तुम्ही शास्त्रलेख शोधता, कारण तुम्ही असे मानता की, त्याद्वारे आपल्याला सार्वकालिक जीवन मिळेल आणि तेच शास्त्रलेख माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत.

नष्ट होणार्‍या अन्नासाठी श्रम करू नका, पण सार्वकालिक जीवनाकरता, टिकणार्‍या अन्नासाठी श्रम करा. मनुष्याचा पुत्र ते तुम्हास देईल, कारण त्याच्यावर देवपित्याने शिक्का मारला आहे.”

माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की, जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे; त्यास मीच शेवटच्या दिवशी उठवीन.”

मी तुम्हास खरे खरे सांगतो, जो विश्वास ठेवतो त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे.

स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे.”

जो माझा देह खातो आणि माझे रक्त पितो त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मीच त्यास शेवटल्या दिवशी पुन्हा उठवीन.

तेव्हा शिमोन पेत्राने त्यास उत्तर दिले, “प्रभू, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने तर आपणाकडे आहेत.

मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो; त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि कोणी त्यांना माझ्या हातातून हिसकावून घेणार नाही.

येशूने तिला म्हटले, “पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मरण पावला असला तरी जगेल. आणि जिवंत असलेला प्रत्येकजण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही, यावर तू विश्वास ठेवतेस काय?” ती त्यास म्हणाली, “होय, प्रभूजी, जगात येणारा जो देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपणच आहात असा विश्वास मी धरला आहे.”

जो आपल्या जीवावर प्रीती करतो तो त्यास मुकेल आणि जो या जगांत आपल्या जीवाचा व्देष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील.

माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हास तसे सांगितले असते; मी तुमच्यासाठी जागा तयार करावयास जातो आणि, मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हास आपल्याजवळ घेईन; यासाठी जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे.

या गोष्टी बोलल्यावर येशू वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, हे पित्या, वेळ आली आहे; पुत्राने तुझे गौरव करावे म्हणून तू आपल्या पुत्राचे गौरव कर. जे तू त्यास दिले आहेत त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे, म्हणून तू त्यास सर्व मनुष्यांमात्रावर अधिकार दिला आहेस. सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच, खरा देव त्या तुला आणि ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला ओळखावे.

येशूने उत्तर दिले, “माझे राज्य या जगाचे नाही. माझे राज्य या जगाचे असते तर यहूद्यांच्या हाती मी दिला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती; पण माझे राज्य येथले नाही.”

प्रभू म्हणतो, ‘आकाश माझे राजासन आहे, पृथ्वी माझे पादासन आहे. तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार? किंवा माझ्या विसाव्याचे स्थान कोणते?

जेव्हा यहूदी नसलेल्यांनी पौलाला असे बोलताना ऐकले तेव्हा ते फार आनंदित झाले, परमेश्वराच्या वचनाला त्यांनी गौरव दिले आणि त्या लोकांपैकी पुष्कळांनी वचनावर विश्वास ठेवला, कारण ते अनंतकाळच्या जीवनासाठी निवडले गेले होते.

आणि त्यांनी तेथील शिष्यांना येशूवरील विश्वासात बळकट केले, त्यांनी आपल्या विश्वासांत अढळ रहावे म्हणून उत्तेजन दिले, ते म्हणाले, “अनेक दुःखांना तोंड देत आपण देवाच्या राज्यात प्रवेश केला पाहिजे.”

त्याने देवाच्या राज्याविषयी प्रचार केला, त्याने प्रभू येशूविषयी शिक्षण दिले, तो हे काम फार धैर्याने करीत असे आणि कोणीही त्यास बोलण्यात अडवू शकले नाही.

म्हणजे जे धीराने सत्कर्मे करीत राहून गौरव, सन्मान व अक्षयता ही मिळवू पाहतात त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच;

म्हणजे, जसे पापाने मरणाच्या योगे राज्य चालविले तसे कृपेने नीतिमत्त्वाच्या योगे प्राप्त होणार्‍या सार्वकालिक जीवनासाठी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे राज्य चालवावे.

पण आता तुम्ही पापापासून मुक्त केले जाऊन देवाचे दास झाला असल्यामुळे, आता तुम्हास पवित्रीकरण हे फळ आहे आणि शेवटी सार्वकालिक जीवन आहे. कारण पापाचे वेतन मरण आहे, पण आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे सार्वकालिक जीवन हे देवाचे कृपादान आहे.

‘कारण जो कोणी प्रभूच्या नावाचा धावा करील त्याचे तारण होईल.’

परंतु ज्याप्रमाणे पवित्र शास्त्र म्हणते, “डोळ्यांनी पाहिले नाही, कानांनी ऐकले नाही आणि मनुष्याच्या मनात जे आले नाही, ते देवाने त्याच्यावर प्रीती करणाऱ्यांसाठी तयार केले आहे.”

म्हणून मृतांच्या पुनरुत्थानाबाबत असे असेल, शरीर जे जमिनीत पुरले गेले आहे ते नाश पावणारे आहे, जे शरीर उठविण्यात येते ते अविनाशी आहे. जे अपमानात पुरले जाते ते गौरवात उठवले जाते जे अशक्तपणात पुरले जाते ते सामर्थ्यात उठते. जे जमिनीत पुरले जाते ते नैसर्गिक शरीर आहे जे उठवले जाते ते आत्मिक शरीर आहे. जर नैसर्गिक शरीरे आहेत तर आध्यात्मिक शरीरेसुद्धा असतात. आणि तेच पवित्र शास्त्र सांगते, “पाहिला मनुष्य, आदाम हा जिवंत जीव झाला,” पण ख्रिस्त जो शेवटचा आदाम झाला तो जीवन देणारा आत्मा झाला. परंतु जे आत्मिक ते प्रथम नाही, जे नैसर्गिक ते प्रथम, मग जे आध्यात्मिक आहे ते. पाहिला मनुष्य भूमीतून म्हणजे तो मातीपासून बनविला गेला, तर दुसरा मनुष्य स्वर्गातून आला. ज्याप्रमाणे तो मनुष्य मातीपासून बनविला गेला, त्याप्रमाणे लोकसुद्धा मातीपासूनच बनविले गेले आणि त्या स्वर्गीय मनुष्याप्रमाणे स्वर्गीय लोकही तसेच आहेत. आणि जो मातीचा होता त्याचे प्रतिरूप आपण धारण केले, त्याचप्रमाणे जो स्वर्गीय आहे त्याचे प्रतिरूप आपण धारण करू.

आता बंधूंनो मी हे सांगतो की, मांस व रक्त ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही आणि विनाशीपणाला अविनाशीपणाचे वतन मिळत नाही. पाहा! मी तुम्हास एक रहस्यमय सत्य सांगत आहे. आपण सर्व मरणार नाही. आपण सर्व बदलून जाऊ. क्षणात, डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच, शेवटचा कर्णा वाजेल तेव्हा, कारण कर्णा वाजेल आणि मरण पावलेले अविनाशीपणात उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ. कारण हे जे विनाशी आहे त्याने अविनाशीपण परिधान करावे आणि हे जे मरणाधीन आहे त्याने अमरपण परिधान करावे हे आवश्यक आहे. हे जे विनाशी त्याने अविनाशीपण धारण करावे व हे जे मरणाधीन आहे त्याने अमरत्व धारण करावे, असे जेव्हा होईल तेव्हा, पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे; “विजयात मरण गिळले गेले आहे.” “अरे मरणा तुझा विजय कोठे आहे? मरणा, तुझी नांगी कोठे आहे?” मरणाची नांगी पाप आहे आणि पापाचे सामर्थ्य नियमशास्त्रापासून येते.

कारण हे जे हलके दुःख केवळ तात्कालिक आहे ते आमच्यासाठी फार अधिक मोठ्या अशा सार्वकालिक गौरवाचा भार तयार करते. आता आम्ही दिसणार्‍या गोष्टींकडे पाहत नाही पण न दिसणार्‍या गोष्टींकडे पाहतो कारण दिसणार्‍या गोष्टी क्षणिक आहेत पण न दिसणार्‍या गोष्टी सार्वकालिक आहेत.

कारण आम्ही हे जाणतो की, आमचे हे जगिक घर ज्यामध्ये आम्ही राहतो, नष्ट झाले तर आम्हास देवापासून मिळालेले सर्वकालचे घर स्वर्गात आहे. या तंबूत आम्ही कण्हत आहोत आणि आमच्या स्वर्गातील घराचा पोशाख करण्यास आम्ही आतुर झालो आहोत.

आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून दूर होऊन प्रभूजवळ राहण्यास आम्ही तयार आहोत.

मला एक ख्रिस्तातील मनुष्य माहीत आहे; तो चौदा वर्षांपूर्वी (शरीरात की शरीराबाहेर हे मला माहीत नाही, देवाला माहीत आहे) तिसर्‍या स्वर्गापर्यंत नेला गेला. तो मला माहीत आहे आणि असा तो मनुष्य (शरीरात की शरीरापासून वेगळा हे मला माहीत नाही, देवाला माहीत आहे) त्या मनुष्यास सुखलोकात उचलून नेण्यात आले आणि मनुष्याने ज्यांचा उच्चारही करणे योग्य नाही अशी वाक्ये त्याने ऐकली.

फसू नका, देवाचा उपहास होणार नाही कारण मनुष्य जे काही पेरतो तेच पीक त्यास मिळेल. कारण जो आपल्या देहाकरता पेरतो त्यास देहाकडून नाशाचे पीक मिळेल, पण जो देवाच्या आत्म्याकरता पेरतो त्यास आत्म्याकडून सार्वकालिक जीवनाचे पीक मिळेल.

आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्याला धन्यवाद असो; स्वर्गीय गोष्टीविषयी प्रत्येक आत्मिक आशीर्वाद देऊन ज्या देवाने आम्हास ख्रिस्ताकडून आशीर्वादित केले आहे.

यामुळे तुम्ही आता परके आणि विदेशी नाही. तर त्याऐवजी तुम्ही पवित्रजनांच्या बरोबरचे सहनागरीक आणि देवाचे कुटुंबीय आहात

कारण मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे. पण जर मी देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे; तर, कोणते निवडावे हे मला समजत नाही. कारण मी दोघासंबंधाने पेचात आहे; येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे कारण देहात राहण्यापेक्षा हे अधिक चांगले आहे;

आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे; तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे; त्याची आपण वाट पाहात आहोत. तो ज्या सामर्थ्याने तो सर्वकाही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे त्या सामर्थ्यांने तो तुमचे आमचे नीच स्थितीचे शरीर आपल्या गौरवीच्या शरीरासारखे व्हावे म्हणून त्यांचे रूपांतर करील.

त्याने आपल्याला अंधकाराच्या सत्तेतून सोडवून त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणले आहे,

वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका;

जो देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हास पाचारण करीत आहे त्यास शोभेल असे तुम्ही चालावे.

म्हणून प्रभू येशू प्रकट होण्याच्या समयी ते होईल; तो आपल्या सामर्थ्यवान देवदूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रकट होईल.

परंतु केवळ याच हेतूने माझ्यावर दया दाखविण्यात आली की माझ्यासारख्या अत्यंत वाईट पाप्यावर ख्रिस्त येशूने सहनशीलता दाखवली त्या उदाहरणावरून, पुढील काळात जे त्याजवर विश्वास ठेवतील त्यांना सर्वकाळचे जीवन मिळावे. आता सर्वकाळचा राजा जो अविनाशी व अदृश्य आहे अशा एकाच देवाला सन्मान आणि गौरव सदासर्वकाळासाठी असो. आमेन.

कारण शरीराच्या कसरतीला अल्प महत्त्व आहे पण देवाच्या सेवेला सर्व प्रकारे महत्त्व आहे कारण ते सध्याच्या जीवनाविषयी आणि भविष्यातील जीवनाविषयी आशीर्वादाचे अभिवचन आहे.

कारण आपण जगात काहीही आणले नाही आणि आपल्याच्याने या जगातून काहीही बाहेर घेऊन जाता येत नाही.

विश्वासासंबंधी चांगले युद्ध कर, ज्यासाठी तुला बोलावले होते. त्या सार्वकालिक जीवनाला धरून ठेव. तू अनेक साक्षीदारांसमोर चांगली साक्ष दिलीस,

चांगले ते करावे, चांगल्या कृत्यात धनवान, उदार व परोपकारी असावे. जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल असा साठा स्वतःसाठी करावा.

पण जी आता आम्हास आमचा तारणारा ख्रिस्त येशू याच्या प्रकट होण्याने दाखवली गेली आहे. ख्रिस्ताने मरणाचा नाश केला आणि सुवार्तेद्वारे अविनाशीपण व जीवन प्रकाशात आणले.

प्रभू मला प्रत्येक वाईट कामापासून सोडवील व आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारील. त्यास सदासर्वकाळपर्यंत गौरव असो. आमेन.

जे सर्वकाळचे जीवन ज्याला असत्य बोलवत नाही त्या देवाने युगाच्या काळापूर्वी देऊ केले,

म्हणजे आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून सार्वकालिक जीवनाच्या आशेप्रमाणे वारीस व्हावे.

पुत्राविषयी तर तो असे म्हणतोः हे देवा, तुझे राजासन सदासर्वकाळासाठी आहे, आणि तुझे राज्य युगानुयुगीचे आहे आणि “तुझा राजदंड न्यायीपणाचा राजदंड आहे.

म्हणून देवाच्या लोकांसाठी अजूनही विसाव्याचा (शब्बाथ) दिवस आहे.

आणि नंतर त्यास परिपूर्ण केल्यावर. जे त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्यासाठी सार्वकालिक तारणाकर्ता तो झाला

म्हणून स्वर्गातील गोष्टींच्या नमुन्याप्रमाणे असलेल्या वस्तू यज्ञाच्या द्वारे शुद्ध करणे जरुरीचे होते. पण त्याहूनही अधिक चांगल्या यज्ञाने स्वर्गीय गोष्टीच्या प्रतिमा शुद्ध केल्या जातात. कारण ख्रिस्ताने मानवी हातांनी केलेल्या पवित्रस्थानात पाऊल ठेवले असे नाही, तर ते स्थान खऱ्या वस्तूची केवळ प्रतिमाच आहे. देवाच्या समोर हजर होण्यासाठी खुद्द स्वर्गात त्याने प्रवेश केला.

पण आता, ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची इच्छा धरतात, ह्यामुळे आपणाला त्यांचा देव म्हणून घेण्यास देवाला त्यांची लाज वाटत नाही कारण त्याने त्यांच्यासाठी एक नगर तयार केले आहे.

परंतु तुम्ही सियोन पर्वताजवळ आणि जिवंत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय यरुशलेम, लाखो देवदूत स्वर्गातील यादीतल्या ज्येष्ठांचा समाज व मंडळी, सर्वांचा न्यायाधीश देव व पूर्ण केलेल्या नीतिमानांचे आत्मे,

कारण स्थायिक असे नगर आपल्याला येथे नाही तरी भविष्यकाळात येणारे जे नगर आहे त्याच्याकडे आपण पाहत आहोत.

आणि त्याद्वारे मिळणारे अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन स्वर्गात तुमच्यासाठी राखून ठेवले आहे,

तो स्वर्गात गेला असून देवाच्या उजवीकडे आहे आणि देवदूत, अधिकारी व सत्ताधीश त्याच्या अधीन आहेत.

म्हणून बंधूंनो, तुमचे पाचारण व तुमची निवड अढळ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. या गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्ही कधी अडखळणार नाही. आणि तशा प्रकारे आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या सार्वकालिक राज्यात जयोत्सावाने तुमचा प्रवेश होईल.

तरी ज्यामध्ये नीतिमत्त्व राहते, असे नवे आकाश व नवे पृथ्वी त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत.

जे आरंभापासून होते, ते आम्ही ऐकले आहे, आमच्या डोळ्यांनी आम्ही जे पाहिले आणि न्याहाळले आहे, जे आमच्या हातांनी हाताळले त्याच जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो. ते जीवन आम्हास प्रकट झाले. आम्ही ते पाहिले आहे; त्याविषयी आम्ही साक्ष देतो आणि आम्ही त्या सार्वकालिक जीवनाविषयी तुम्हास घोषणा करीत आहोत. ते जीवन पित्याजवळ होते आणि ते आम्हास प्रकट केले गेले.

जग व जगातील वासना नाहीशा होत आहेत. पण जो देवाच्या इच्छेप्रमाणे करतो तो सर्वकाळपर्यंत जगेल.

आणि देवाने आम्हास जे देण्याचे अभिवचन दिले आहे ते म्हणजे सार्वकालिक जीवन होय.

प्रियांनो, आता आम्ही देवाची मुले आहोत आणि भविष्यकाळात आम्ही कसे असू हे आम्हास माहीत नाही. तरीही आम्हास माहीत आहे की, जेव्हा ख्रिस्त पुन्हा येईल, तेव्हा आम्ही त्याच्यासारखे असू, कारण तो जसा आहे तसे आम्ही त्यास पाहू.

आणि देवाची जी साक्ष आहे तीही आहे की, देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आहे आणि हे जीवन त्याच्या पुत्राच्या ठायी आहे. ज्याच्याजवळ पुत्र आहे त्यास जीवन आहे पण ज्याच्याजवळ पुत्र नाही त्यास जीवन नाही. जे देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवतात त्यांना मी या गोष्टी लिहीत आहे, यासाठी की, तुम्हास सार्वकालिक जीवन लाभले आहे, याविषयी तुम्हास कळावे.

पण आम्हास माहीत आहे की देवाचा पुत्र आला आहे व त्याने आम्हास समजबुद्धी दिलेली आहे, यासाठी की, जो खरा आहे त्यास आम्ही ओळखावे आणि जो खरा आहे त्याच्याठायी म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याठायी, आपण आहोत. हाच खरा देव आहे आणि तो सार्वकालिक जीवन आहे.

तुम्ही सर्वकाळच्या जीवनासाठी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या दयेची प्रतीक्षा करीत स्वतःला देवाच्या प्रीतीत राखा.

आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको! जो विजय मिळवतो त्यास देवाच्या बागेतल्या जीवनाच्या झाडाचे फळ खाण्याचा अधिकार देईन.

जो विजय मिळवतो, तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान करील, मी त्याचे नाव ‘जीवनाच्या पुस्तकातून’ ‘खोडणारच’ नाही; पण माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतांसमोर त्याचे नाव स्वीकारीन,

ज्याप्रमाणे मी विजय मिळवला आणि माझ्या पित्याच्या राजासनावर बसलो आहे तसा जो विजय मिळवील त्यास मी माझ्या राजासनावर बसण्याचा अधिकार देईन.

ह्यानंतर मी पाहिले तो पाहा, स्वर्गात एक दरवाजा माझ्यासमोर उघडलेला दिसला आणि अगोदर जसा आवाज मी माझ्याशी बोलताना ऐकला होता तसाच आवाज मी ऐकला. तो आवाज ‘कर्ण्याच्या’ आवाजासारखा होता. तो म्हणाला, “इकडे वर ये आणि मी तुला यानंतर जे घडणार आहे ते दाखवितो.” त्याच क्षणी आत्म्याने माझा ताबा घेतला. तेथे स्वर्गात ‘माझ्यासमोर राजासन होते कोणीएक त्यावर बसला होता.’ त्यावर जो बसला होता तो यास्फे व सार्दी या रत्नांसारखा होता आणि ‘राजासनाभोवती’ पाचूसारखे दिसणारे ‘मेघधनुष्य होते.’ राजासनाभोवती चोवीस आसने होती आणि त्या आसनांवर शुभ्र कपडे घातलेले व डोक्यावर सोन्याचा मुकुट असलेले चोवीस वडील बसले होते.

राजासनापासून विजा, वाणी व मेघगर्जना निघत होत्या. राजासनासमोर सात दिवे जळत होते. ते देवाचे सात आत्मे होते. तसेच राजासनासमोर काचेच्या समुद्रासारखे काहीतरी दिसत होते. ते ‘स्फटिकासारखे’ स्पष्ट होते. मध्यभागी व राजासनाभोवती चार जिवंत प्राणी होते आणि ते मागून पुढून डोळ्यांनी पूर्ण भरलेले होते. ‘पहिला जिवंत प्राणी सिंहासारखा’ होता ‘दुसरा बैलासारखा होता’ ‘तिसऱ्याचा चेहरा मनुष्यासारखा होता,’ आणि ‘चौथा उडत्या गरुडासारखा होता.’ त्या ‘प्रत्येक जिवंत प्राण्याला सहा पंख होते’ व त्यांना सगळीकडे डोळे होते, त्यांच्या पंखावर आणि आतून डोळे होते, दिवस व रात्र न थांबता ते म्हणत होते. ‘पवित्र, पवित्र, पवित्र,’ हा प्रभू देव सर्वसमर्थ जो होता, जो आहे आणि जो येणार आहे.

जो राजासनावर बसलेला आहे तो अनंतकाळपर्यंत जिवंत राहणार आहे त्याचे जेव्हा जेव्हा ते चार जिवंत प्राणी गौरव, सन्मान व उपकारस्तुती करीत होते, तेव्हा तेव्हा ते चोवीस वडील जो राजासनावर बसला आहे त्याच्यापुढे पालथे पडतात आणि जो युगानुयुग जिवंत आहे त्यास नमन करतात आणि आपले मुकुट राजासनासमोर ठेवून म्हणतात “हे प्रभू, आमच्या देवा, तू गौरव, सन्मान आणि सामर्थ्य प्राप्त करून घेण्यास योग्य आहेस, तू सर्व गोष्टी उत्पन्न केल्यास, कारण तू सर्वकाही अस्तित्वात आणले आणि तुझ्या इच्छेमुळे ते झाले आणि उत्पन्न केले.”

तू त्यांना आमच्या देवासाठी एक ‘राज्य’ आणि ‘याजक’ बनविले आणि नंतर ते पृथ्वीवर राज्य करतील.” मग मी पाहिले राजासन आणि, चार जिवंत प्राणी व वडीलजन यांच्यासभोवती अगणित देवदूतांची वाणी ऐकली, त्यांची संख्या ‘अयुतांची अयुते व हजारो हजार होती.’

या यानंतर मी पाहिले, तो प्रत्येक राष्ट्र, वंश, लोक व भाषा यांच्यातील कोणाच्याने मोजला जाऊ शकणार नाही एवढा मोठा समुदाय, तो राजासनापुढे व कोकऱ्याच्यापुढे उभा होता. शुभ्र झगे घातलेले आणि त्यांच्या हातात झावळ्या होत्या. ते मोठ्याने ओरडून म्हणत होतेः ‘राजासनावर बसलेल्या’ आमच्या देवाकडून व कोकऱ्याकडून, तारण आहे. तेव्हा राजासन व वडील आणि चार जिवंत प्राणी यांच्यासभोवती सर्व देवदूत उभे होते आणि ते राजासनासमोर पालथे पडून देवाला नमन करीत म्हणाले, आमेन; स्तुती, गौरव, ज्ञान, उपकारस्तुती, सन्मान, सामर्थ्य व बळ ही युगानुयुग आमच्या देवाची आहेत; आमेन.

म्हणून ते देवाच्या राजासनासमोर आहेत आणि ते रात्रंदिवस त्याच्या भवनात सेवा करतात. जो ‘राजासनावर बसलेला’ आहे तो आपला मंडप त्यांच्यावर घालील. ते आणखी भुकेले आणि आणखी तान्हेले होणार नाहीत, त्यास सूर्य किंवा कोणतीही उष्णता बाधणार नाही. कारण राजासनाच्या मध्यभागी असलेला कोकरा स्वतः त्यांचा मेंढपाळ होईल, आणि तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्यांजवळ नेईल; आणि देव स्वतः त्यांच्या डोळ्यातील ‘सर्व अश्रू पुसून टाकील.’

तेव्हा देवाचे स्वर्गातील भवन उघडले व त्याच्या भवनात त्याच्या कराराचा कोश दिसला; आणि विजांचे लखलखाट, गर्जना आणि गडगडाट होऊन भूकंप झाला व गारांचे मोठे वादळ झाले.

आणि स्वर्गात युद्ध झाले; ‘मिखाएल’ व त्याचे दूत हे अजगराबरोबर लढले आणि अजगर व त्याचे दूत हे सुद्धा त्यांच्याशी लढले. पण अजगर जिंकण्यास तितका बलवान नव्हता आणि त्यापुढे स्वर्गात त्यास व त्याच्या दूतांना स्थान उरले नाही.

आणि तो देवदूत मला म्हणाला, “लिहीः ‘कोकर्‍याच्या लग्नाच्या भोजनाला बोलावलेले धन्य होत.’” आणि तो मला म्हणाला, “ही देवाची खरी वचने आहेत.”

तेव्हा मी एक, मोठे, शुभ्र ‘राजासन’ आणि त्यावर जो ‘बसला’ होता त्यास बघितले. त्याच्या उपस्थितीतून पृथ्वी व आकाशही ‘पळून गेली; आणि त्यांना कोठेच जागा मिळाली नाही.’

आणि मी नवे आकाश आणि नवी पृथ्वी ही बघितली कारण पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नव्हता. आणि मी ती ‘पवित्र नगरी, नवे यरुशलेम,’ देवाकडून स्वर्गातून खाली येत असलेली बघितली. ती वरासाठी साज चढवून ‘सजविलेल्या वधूप्रमाणे’ दिसत होती; आणि मी राजासनातून एक मोठी वाणी ऐकली; ती म्हणालीः “पाहा, देवाचा ‘मंडप’ मनुष्यांत आहे, तो त्यांच्याबरोबर वस्ती करील; ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः ‘त्यांच्याबरोबर राहील’ ‘तो त्यांच्या डोळ्यांतले सर्व अश्रू पुसेल;’ आणि ह्यापुढे मरण राहणार नाही; ‘दुःख, आक्रोश,’ किंवा क्लेशही होणार नाहीत; कारण ‘पहिल्या गोष्टी’ होऊन गेल्या आहेत.”

‘तेव्हा राजासनावर बसलेला’ म्हणालाः पाहा, मी सर्वकाही नवीन करतो आणि तो मला म्हणाला, लिही; कारण ही वचने विश्वसनीय आणि खरी आहेत. आणि तो मला म्हणालाः “या गोष्टी झाल्या आहेत. मी अल्फा आणि ओमेगा, आरंभ आणि शेवट आहे. जो ‘तान्हेला असेल त्यास मी जीवनाच्या’ झर्‍याचे ‘पाणी फुकट’ देईन. जो विजय मिळवतो तो या सर्व गोष्टी वारशाने मिळवील; ‘मी त्यांचा देव होईन आणि तो माझा पुत्र होईल.’ पण भेकड, अविश्वासू, अमंगळ, खुनी, जारकर्मी, चेटकी, मूर्तिपुजक आणि सगळे लबाड ह्यांना अग्नीने आणि गंधकाने जळणार्‍या सरोवरात वाटा मिळेल; हे दुसरे मरण होय.” मग ज्या सात देवदूतांनी त्या सात शेवटल्या पीडांनी भरलेल्या, सात वाट्या घेतल्या होत्या त्यांच्यातला एक येऊन माझ्याशी बोलला आणि मला म्हणाला, “इकडे ये, मी तुला वधू, कोकर्‍याची नवरी दाखवतो.”

तेव्हा त्याने ‘मला’ आत्म्याने एका मोठ्या ‘उंच डोंगरावर नेले आणि त्याने मला ती पवित्र नगरी यरुशलेम’ देवाकडून स्वर्गातून खाली उतरतांना दाखवली. यरुशलेमेच्या ठायी ‘देवाचे तेज’ होते; आणि तिचे तेज अतिमोलवान खड्यासारखे; स्फटिकाप्रमाणे चमकणार्‍या यास्फे रत्नासारखे होते. तिला मोठा आणि उंच तट होता; त्यास बारा ‘वेशी’ होत्या आणि वेशींपुढे बारा देवदूत होते आणि त्यावर ‘नावे’ लिहिलेली होती; ती इस्राएलाच्या बारा ‘वंशजांची’ नावे होती, ‘पूर्वेकडे तीन वेशी; उत्तरेकडे तीन वेशी; दक्षिणेकडे तीन वेशी आणि पश्चिमेकडे तीन वेशी होत्या.’ आणि नगरीच्या तटाला बारा पाये होते; त्यावर कोकर्‍याच्या बारा प्रेषितांची नावे होती.

आणि जो माझ्याशी बोलत होता त्याच्याजवळ त्या नगरीचे, तिच्या वेशींचे व तिच्या तटाचे माप घ्यायला एक सोन्याचा ‘बोरू’ होता. ती नगरी चौकोनी बांधलेली होती; आणि तिची लांबी जितकी होती तितकीच तिची रुंदी होती; आणि त्याने बोरूने माप घेतले ते साडेसातशे कोस भरले; तिची लांबी, रुंदी आणि उंची या समसमान होत्या. आणि त्याने ‘तटाचे माप घेतले’ ते मनुष्याच्या म्हणजे त्या दूताच्या हाताप्रमाणे एकशे चव्वेचाळीस हात भरले; तिच्या तटाचे बांधकाम यास्फे रत्नाचे होते; आणि नगरी स्वच्छ काचेप्रमाणे, शुद्ध सोन्याची होती. आणि नगरीच्या तटाचे ‘पाये’ अनेक प्रकारचे ‘मोलवान पाषाण’ लावून सजविले होते. पहिला पाया यास्फे, दुसरा नीलमणी, तिसरा शिवधातू चवथा पाचू, पाचवा गोमेद, सहावा सार्दि, सातवा लसण्या, आठवा वैडूर्य, नववा पुष्कराज, दहावा सोनलसणी, अकरावा याकीथ आणि बारावा पद्मंराग. आणि बारा वेशी बारा मोत्यांच्या होत्या; प्रत्येक वेस एका मोत्याची केली होती. नगरीचा रस्ता शुद्ध सोन्याचा, पारदर्शक काचेसारखा होता.

आणि मी तेथे भवन बघितले नाही; कारण सर्वसमर्थ प्रभू देव आणि कोकरा हेच तिचे भवन आहेत. आणि त्या नगरीला प्रकाश द्यायला सूर्याची किंवा चंद्राची गरज नव्हती; कारण ‘देवाचे तेज’ तिला प्रकाश देते आणि कोकरा तिचा दिवा आहे, ‘राष्ट्रे’ तिच्या ‘प्रकाशात चालतील; आणि पृथ्वीचे राजे’ आपले ‘वैभव’ तिच्यात आणतील. तिच्या ‘वेशी दिवसा कधीही बंद केल्या जाणार नाहीत; आणि तेथे रात्र’ होणारच नाही. त्या ‘राष्ट्रांकडून वैभव’ आणि मान तिच्यात आणतील; तेथे कोणतीही अशुद्ध गोष्ट किंवा अमंगळपणाची कृती करणारा अथवा लबाडी करणारा कोणीही मनुष्य, कोणत्याही प्रकारे ‘प्रवेश करणार नाही’ पण कोकर्‍याच्या ‘जीवनाच्या पुस्तकात ज्यांची नावे लिहिण्यात आली आहेत त्यांनाच’ प्रवेश करता येईल.

नंतर देवदूताने मला जीवनाच्या पाण्याची एक नदी दाखविली. ती नदी स्फटिकासारखी स्वच्छ होती. ती नदी देवाच्या आणि कोकऱ्यांच्या राजासनापासून उगम पावत होती आणि नगराच्या रस्त्यांच्या मधोमध वाहत होती. नदीच्या ‘दोन्ही काठांवर’ बारा जातीची फळे देणारे जीवनाचे झाड होते, ‘ते प्रत्येक महिन्यास आपले फळ’ देते. झाडांची ‘पाने’ राष्ट्राच्या ‘आरोग्यासाठी’ उपयोगी पडतात, ‘त्या नगरात यापुढे कसलाही शाप असणार नाही;’ त्याच्यामध्ये देवाचे व त्याच्या कोकऱ्याचे राजासन राहिल. त्याचे दास त्याची सेवा करतील. आणि ‘ते त्याचे मुख पाहतील’ व त्यांच्या कपाळावर देवाचे नाव लिहिलेले असेल. त्या नगरात यापुढे कधीही रात्र होणार नाही. लोकांस प्रकाश मिळविण्यासठी ह्यापुढे कुठल्याही दिव्याची अथवा सूर्याची गरज पडणार नाही; कारण ‘प्रभू देव’ आपला ‘प्रकाश त्यांच्यावर पाडील; आणि ते युगानुयुग राज्य करतील.’

आपल्याला ‘जीवनाच्या झाडावर’ अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत आपले जाणे व्हावे म्हणून जे आपले ‘झगे धुतात’ ते धन्य आहेत.

आत्मा आणि नवरी असे म्हणतात की, “ये,” आणि जो कोणी हे ऐकतो, तो असे म्हणो की, “ये,” आणि जो तहानेला आहे, तो येवो, ज्या कोणाला पाहिजे, तो ‘फुकट दिले जाणारे जीवनी पाणी घेवो.’

Marathi - मराठी - MR

MRIRV'17 - Marathi Indian Revised Version - 2017

This Bible text is from Marathi Indian Revised Version IRV 2019
https://open.bible/bibles/marathi-bridge-text-bible/
provided by: Bridge Connectivity Solutions Pvt Ltd, available by Creative Commons CC-BY-SA-4.0,
and this new compilation is shared as www.creativecommons.org/licenses/by-sa/4.0.
Languages are made available to you by www.ipedge.net